कांट्याच्या अणिवर वसले तिन गांव ।
दोन ओसाड, एक वसेचि ना ॥१॥
वसेचि ना तेथें आले तीन कुंभार ।
दोन थोटे, एका घडीच ना ॥२॥
घडीच ना त्यानें घडलीं तीन मडकीं ।
दोन कच्चीं, एक भाजेचि ना ॥३॥
भाजेचि ना त्यांत रांधले तीन मूग ।
दोन हिरवे, एक शिजेचि ना ॥४॥
शिजेचि ना तेथें आले तीन पाहुणे ।
दोन रुसले, एक जेवीच ना ॥५॥
जेवीच ना त्याला दिल्ह्या तीन म्हशी ।
दोन वांझ्या, एक फळेचि ना ॥६॥
फळेचि ना तिला झाले तीन टोणगे ।
दोन मेले, एक जगेचि ना ॥७॥
जगेचि ना त्याचे आले तीन रुपये ।
दोन खोटे, एक चालेचि ना ॥८॥
चालेचि ना तेथें आले तीन पारखी ।
दोन आंधळे, एका दिसेचि ना ॥९॥
दिसेचि ना त्याला दिल्या तीन बुक्क्या ।
दोन हुकल्या, एक लागेचि ना ॥१०॥
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवांचोनि कळेचि ना ॥११॥
